मुंबई – कर्नाटकव्याप्त भागात राहणाऱ्या मराठी भाषिक गावांना महाराष्ट्रात आणण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेनं जोर धरला आहे. त्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी “बेळगाव तर सोडाच, मुंबईही सुद्धा आमचाच भाग आहे’, असं म्हंटल होत. त्यांच्या या बेताल व्यक्तव्यामुळे लक्ष्मण सवदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर आज (दि. २८) मुंबईतमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीची एक बैठक पार पडली. कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्व पक्षीयांनी एकजुटीने व आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले आहे, ते थांबवावे लागेल. या प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात यावा. त्यासाठी समन्वयक मंत्री आणि सीमा प्रश्न कक्ष यांनी वकील आणि विविध घटकांचा समन्वय करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार इत्यादी उपस्थित होते.