पक्षाच्या शहर आणि जिल्हा नेत्यांत योजना पूर्ण होण्यापूर्वीच टोकाची मतमतांतरे
पुणे – भामा-आसखेड पाणीप्रश्नावर आताच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शहरी आणि ग्रामीण,असा वाद सुरू झालेला असताना पाणी वाटपाबाबत भारतीय जनता पक्षात मतमतांतरे दिसून येत असून यातून पाणी वाटपाबाबतचा दुटप्पीपणा उघड पडत आहे.
शहराला पाणी देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असे शहरातील भाजपचे एक पदाधिकारी म्हणतात तर दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय शहराला पाणी देणार नाही, असे ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी सांगतात. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पाणी वाटपाबाबतची मतेही वेगळी असल्याने यात दुटप्पीपणाचीच भूमिकाच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भामा-आसखेडचे पाणी हवेली आणि दौंड तालुक्यातील शेतीला द्यायचे ठरले. त्यानुसार या कामाला सुरवात झाली. प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन करण्यास सुरवात झाली. मात्र, राज्य सरकारने या प्रकल्पाचा हेतू बदलत पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पाणी देण्याचा विषय समोर आणला. अन् पुर्नवसनाची प्रक्रियाही थांबवली. सरकारच्या याच नव्या मुद्याचे आयते कोलीतही भाजपला सापडले.
दरम्यान, शहराच्या पूर्व भागाला भामा-आसखेडचे पाणी देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीप मुळीक यांनी छातीठोकपणे सांगितले. तर, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी विरोधी मते मांडल्याने पाण्याच्या मुद्यावर कुरबुर सुरू झाली. एकीकडे शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी मागणी तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी प्रकल्पाच विरोध, अशी वेगळे मत सध्या भामाआसखेडच्या पाण्याबाबत भाजपमध्ये दिसू येत आहेत. पक्षाच्या या दुटप्पी धोरणाची चर्च अन्य पक्षात चवीनं केली जात आहे.
राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांत भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. पुणेकरांना भामा-आसखेडचे पाणी देण्यास भाजप कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहे.
– जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, माजी आमदार भाजपा
भामा-आसखेडचे पाणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडला देण्यास आमची काही हरकत नाही. मात्र, त्याआधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा. त्यांना हक्काचे पाणी ठेवून अन्य पाण्याचे पुर्नवाटप करून नियोजन करा. भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचा मुख्य हेतू हा शेतीसाठी होता. मात्र, त्यामध्ये बदल करून तो पिण्यासाठी करण्यात आला. जर हा हेतू बदलला तर पुर्नवसनाचा हेतूही बदलावा. यामध्ये राजकारण न आणता, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. तरच शहरांना पाणी देण्याबाबत विचार करू.
– शरद बुट्टेपाटील, गटनेते, जिल्हा परिषद, भाजपा