मुंबईतील बैठकीत अनेक मागण्यांवर चर्चा
बारामती – राज्यातील मेंढपाळ समाजाला संरक्षण तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याबाबत पोलिस महासंचालकांना निर्देश दिले जातील, अशी हमी गृहमंत्र्यांनी यावेळी दिली असल्याची माहिती नवनाथ पडळकर यांनी दिली.
जनता राज अभियान आयोजित ‘मेंढपाळ हक्क परिषदे’तील प्रमुख मागण्यावर चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दि.1 रोजी बैठक आयोजित केली होती. बैठकीत धनगर समाजातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये राज्यात मेंढपाळांवर हल्ले होत असून त्यावर कायमचा उपाय म्हणून मेंढपाळ संरक्षण कायदा मंजूर करावा. मेंढपाळावर होणारा हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा म्हणून नोंद केला जावा व तसा कायदाच करून संरक्षण प्राप्त व्हावे. मेंढपाळ समाज हा हजारो वर्षापासून जंगल दऱ्या-खोऱ्यात दुर्गम भागात वावरत आला आहे. या भागात स्वसंरक्षण करण्यासाठी व पशुधन संरक्षणासाठी तो हजारो वर्षांपासून कोयते, विळा, कुऱ्हाड, काठी अशी शस्त्रे बाळगत आला आहे. म्हणजेच ही शस्त्रे धनगरी मेंढपाळ संस्कृती चे मूलभूत घटक आहेत. त्यामुळे अशी शस्त्र बाळगणे हा मेंढपाळ समाजाचा ‘सांस्कृतिक अधिकार’ आहे. या सांस्कृतिक अधिकाराला सरकारने ‘कायदेशीर अधिकार’ म्हणून दर्जा बहाल करावा.
स्व-संरक्षणसाठी बंदुकीचा परवानाही दिला जावा. धनगर आरक्षण आंदोलनातील आंदोलक तसेच समाजसेवक यांच्यावर गेल्या 20 वर्षात नोंदविलेले व दाखल केलेले विविध प्रकारचे गुन्हे मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून लवकरात लवकर गुन्हे मागे घ्यावेत. अशा मागण्या शिष्टमंडळाने यावेळी मांडल्या. तसेच ‘मेंढपाळ हक्कनामा’ मंजूर करावा, असा आग्रह नवनाथ पडळकर यांनी गृहमंत्र्यांसमोर धरला.
तसेच मेंढपाळ हक्कनाम्याबाबत निर्णय लवकर न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, अशी यावेळी शिष्टमंडळाने घेतली. यावेळी राज्यमंत्री दत्ता भरणे, माजी आमदार रामराव वडकुते, रमेश शेंडगे, हरिभाऊ भदे, प्रकाश शेंडगे तसेच उत्तम जानकर, नवनाथ पडळकर, गणेश हाके, अनिल गोयकर, सक्षना सलगर, मल्लिकार्जुन पुजारी, आनंद कोकरे आदी नेते व अनेक मेंढपाळ बांधव प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
धनगर समाजासह इतर समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याबाबत पोलीस महासंचालकांना लवकरात लवकर निर्देश देण्यात यावेत. तसेच आंदोलकांवरील गंभीर व किरकोळ स्वरूपातील सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात यावेत.
– किशोर मासाळ, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस