मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्या राजकीय बंडामुळे भाजपला सरकार स्थापन करणे शक्य झाले. सत्तेसाठी भाजपने आखलेला प्लॅन बी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटूंबातील दुहीमुळे तडीस गेल्याची कुजबूज आता सुरू झाली आहे.
शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्लॅन ए यशस्वी होऊ शकला नाही. तशातच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष नवी महाआघाडी स्थापून सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील अंतिम टप्प्यापर्यंत पोहचल्याचे चित्र शुक्रवारी रात्री निर्माण झाले. त्यानंतर भाजपने वेगवान हालचाली करून अजित पवार यांचा सहभाग असलेला प्लॅन बी मार्गी लावला. त्यामुळे मी पुन्हा येईन हे शब्द खरे ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सकाळच्या सुमारास झाला. त्या चकित करणाऱ्या वृत्ताने महाराष्ट्रातील बहुतांश जनतेवर जणू खडबडून जागे होण्याची वेळ आली.
पवार कुटूंबात दुही असल्याचे संकेत याआधी काही घटनांमधून मिळाले होते. प्रामुख्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तिकीट वाटपावरून पवार कुटूंबात मतभेद असल्याचे बोलले जात होते. त्यातून शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे एका बाजूला, तर अजित पवार दुसऱ्या बाजूला असे चित्रही पुढे आले. ती दुहीच भाजपसाठी राजकीय फायद्याची ठरल्याच्या चर्चांना आता तोंड फुटले आहे. स्वत: सुप्रिया यांच्या प्रतिक्रियेमुळे त्या चर्चांना आणखी खतपाणी मिळणार आहे. पक्षाबरोबरच घरही फुटल्याची खंत त्यांनी त्या प्रतिक्रियेतून व्यक्त केली.
दरम्यान, महाराष्ट्रात वेगळीच राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतात, असा थोडाफार अंदाज कॉंग्रेसने बांधला होता. ते कॉंग्रेसच्या एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमुळे सूचित झाले. शरद पवार यांनी आपल्याबरोबर यावे यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शरद पवार यांचे मन वळवण्याच्या हालचाली केल्या जात होत्या. पटेल आणि अजित पवार यांच्या विरोधात ईडीचा तपास सुरू आहे. भाजपबरोबर गेल्यास त्या नेत्यांना दिलासा मिळेल असा संदेश दिला गेला, असा आरोप कॉंग्रेसच्या संबंधित नेत्याने केला.