मंचर – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे.
गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन- दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ लोणी (ता. आंबेगाव) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी सभापती मंगलदास बांदल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, उद्योजक देवेंद्र शहा, सचिन भोर, सचिन पानसरे, अरुण गिरे, सविता बगाटे,
जयसिंग एरंडे, सुनील बाणखिले, रूपालीताई भोजने, गणपतराव इंदोरे, रेवती वाडेकर, रवींद्र करंजखेले, मथाजी पोखरकर, अनिल डोके, महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुषमाताई शिंदे, अनिल वाळुंज, महेंद्र वाळुंज, निलेश स्वामी थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महेंद्र वाळुंज, विवेक वळसे पाटील, रवींद्र करंजखेले यांची भाषणे झाली.
अजित पवार म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळवाडी, शिरदाळे तसेच सातगाव पठार, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येथून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिल्यास राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पाण्याच्या विविध योजनेसाठी निधी उपलब्ध करून पाणीप्रश्न मार्गी लावू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील म्हणाले,
पंधरा वर्षे खासदार असताना व खासदार नसतानाही मी जनतेसाठी काम केले. जनतेच्या सुखदुःखात, लग्नाच्या, दशक्रियाच्या कार्यक्रमात सहभागी झालो, यात कमीपणा कसला? मी खासदार नसतानाही गावागावात निधी टाकण्यासाठी प्रयत्न केला आहे विविध विकासकामे मार्गी लावले आहेत.
विद्यमान खासदारांना फोन केला की त्यांचे पीए उचलतात व मीच खासदार बोलत आहे, असे सांगतात. खासदारांचा 80 टक्के निधी परत गेला, असे मी पेपरात वाचले. त्यामुळे जनतेने बिनकामाच्या खासदाराला घरी बसवावे.
जुलैमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. त्यामुळे आंबेगावात 600 कोटींची कामे मार्गी लावता आली. 8 दिवसांत हिरड्याच्या नुकसानीची 17 कोटींची भरपाई दिली. जिल्हा नियोजनमधून आंबेगावसाठी 68 कोटी रुपये निधी दिला. सत्तेशिवाय काही उपयोग नाही, आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामे झाली असती का? -अजित पवार, उपमुख्यमंत्री
आपल्या खासदाराने त्यांच्या कोपरे या दत्तक गावाच्या तोंडाला पाने पुसली. पाणीटंचाईत तेथील महिलांना दोन ते अडीच किमी पायपीट करुन पाणी आणायला लागत असताना, त्यांनी गाव वार्यावर सोडले. पण माझ्या संस्था आणि कार्यकर्त्यांकडून दोन महिन्यांपासून तेथे टँकर सुरु आहे. त्यामुळे कोणतेही काम न करता, आरोप करणार्या निष्क्रीय खासदाराला त्याची जागा दाखवायलाच लागेल. -शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे शिरुरचे उमेदवार