मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना सत्तेमध्ये अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर अडून बसली आहे. तर भाजपने मात्र आमचं ठरलंय याला स्पष्ट नकार दिला आहे. यावर आता सोमवार, बुधवार भाजपचा मुख्यमंत्री तर मंगळवारी, गुरुवारी शिवसेनेचा करा. रविवार आठवलेसाहेबांसाठी राखीव ठेवा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचे पाय ओढत असून यावरून जनतेला त्यांचे चारित्र्य कळाले आहे. भाजप-शिवसेनेची युती असल्याने सत्ता स्थापनेची जबबादारी आहे. सोमवारी, बुधवार भाजपचा तर मंगळवारी, गुरुवारी शिवसेनेचा करा. रविवार आठवलेसाहेबांसाठी राखीव ठेवा. भाजप-शिवसेना जनतेला मूर्ख बनवत असल्याची टीका आव्हाडांनी केली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. मात्र, शिवसेना सत्तेमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर भाजपने मात्र स्पष्ट नकार दिला आहे. तसेच ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त समजते आहे.