पुणे – करोना काळात केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेतून मिळणाऱ्या पी.एफ.ची करोडो रुपयांची रक्कम लाटण्यात आली आहे. ही रक्कम तब्बल ८९ बोगस आस्थापना स्थापन करुन लाटण्यात आली. याप्रकरणी पी.एफ.कार्यालाच्यावतीने वानवडी पोलीस ठाण्यात संबंधित ८९ आस्थापनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भविष्य निर्वाह निधी संघटनचे(पी.एफ. कार्यालय) अधिकारी मनोजकुमार असराणी यांनी तक्रार दाखल केली आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे ८९ संस्थांनी ऑनलाइन अर्ज करुन पी.एफ.अर्ज मिळवले. त्यासाठी लागणारी शॉप अॅक्ट, पत्त्याचे पुरावे व इतर कागदपत्रे बोगस तयार करुन दिली. मात्र, सर्व अर्जांवर मोबाइल नंबर एकच होता. यामुळे संशय आल्याने कार्यालयाने संबंधित पत्त्यांवर जाऊन पडताळणी केली, तेव्हा अशा कोणत्याच आस्थापना अस्तित्वात नसल्याचे आढळून आले.
यातील ८९ पैकी ४२ अस्थापनांनी केंद्र सरकारकडून ९ कोटी ५६ लाख ७६ हजार रुपये बोगस कामगारांच्या नावे घेतले. त्यापैकी २ कोटी ४० लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. तर ४७ अस्थापनांनी ८ कोटी ८९ लाख ३५ हजार रुपये घेतले. त्यापैकी २ कोटी २१ लाख ८ हजार रुपये काढून घेतले.
केंद्र सरकारलाच फसवले
करोना काळात ज्या कामगारांचे काम गेले आणि ज्यांना खासगी नोकऱ्या मिळत नाहीत, अशांना एखाद्या कंपनीने काम दिल्यास त्यांची पी.एफ.ची रक्कम केंद्र सरकार भरणार, अशी योजना श्रम व रोजगार मंत्रालयाने लागू केली होती, या अंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असा हेतू होता. ज्या कंपनीच्या कामगारांची संख्या एक हजारच्या वर असेल त्यांना कामगारांच्या पी.एफ.ची १२ टक्के रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार होती.