मुंबई – आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.यावेऴी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपचे सरकार कोसळले, तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल,” असे महत्वपूर्ण वक्तव्य मलिक यांनी केले आहे. दरम्यान, महाष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आज झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नवाब मलिक आणि जयंत पाटील यांचा समावेश होता. याच बैठकीनंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी विश्वासदर्शक ठरावामध्ये सरकार पडले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करु शकते अस मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना 50-50 च्या सूत्रावर अडून बसली आहे तर भाजपने त्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे.
यावरुनच आता भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का या विषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आज मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मलिक यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर नवीन समिकरणांच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.