नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत असे म्हणत सडकून टीका केली होती. या टीकेवरन देशात सध्या नवा वाद सुरु झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यातच आज भाजपाच्या आमदाराने सोनिया गांधी यांचा उल्लेख ‘विषकन्या’ असा केला आहे.
“सोनिया गांधी या विषकन्या आहेत. सगळ्या जगाने मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. एक काळ असा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. नंतर त्यांनी रेड कार्पेट टाकलं आणि मोदींचं स्वागत केलं. आता मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप असं म्हटलं आहे. ते विष ओकत आहेत असं म्हटलं होतं. मात्र मी खर्गेंना सांगू इच्छितो की ज्या पक्षात तुम्ही नाचत आहात सोनिया गांधी विषकन्या आहेत. सोनिया गांधी या चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून त्यांच्या एजंटचं काम केलं.” असे म्हणत भाजपा आमदार बासनगौडा यांनी सोनिया गांधींवर टीका केली.
कर्नाटक विधानसभेच्या प्रचारसभे दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी साप आहेत. ते विष ओकत असतात. तुम्ही त्यांच्या सहवासात गेलात तरीही तुम्ही मरुन जाल. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंवर टीकेची झोड उठली. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गेंनी स्पष्टीकरण दिले..
भाजपाने मल्लिकार्जुन खर्गेंवर टीका केल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली नाही. तर मी त्यांची विचारधारा विषारी आहे या अर्थाने म्हटलं होतं,’ असे स्पष्टीकरण मल्लिकार्जुन खर्गेंनी दिले आहे.