-राहुल गोखले
केवळ व्यक्तिगत लाभाच्या अभावातून निघालेले खंत-स्वर काढत बसून उद्वेग किती वेळा आणि किती काळ प्रकट करत बसायचे आणि मुख्य म्हणजे या उद्वेगाचे भवितव्य काय, याचा विचार एकनाथ खडसे यांनी करावयास हवा.
नव्या व्यवस्थेत आपल्याला अपेक्षित स्थान मिळाले नाही की, माणूस त्या व्यवस्थेतील फोलपणा अधोरेखित करू लागतो आणि ज्या जुन्या व्यवस्थेत त्या माणसाने अधिक सुविधा उपभोगलेल्या असतात त्या व्यवस्थेत कसा काही अर्थ भरलेला होता, हे पटवून देऊ लागतो. 2016 मध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना फडणवीस मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर लवकरच आपले पुनर्वसन होईल अशी खडसे यांची अपेक्षा होती. ती आजतागायत पूर्ण झालेली नाही.
साहजिकच त्यांनी फडणवीस यांना वारंवार लक्ष्य केले आहे आणि आता तर त्यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्यामुळे आपल्याला त्रास झाला असल्याची खंत व्यक्त केली. एवढेच नव्हे तर आपण लवकरच काही खुलासे करणारे पुस्तक लिहिणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. खडसे यांच्या या खडाखडीकडे एका नाराज नेत्याची अगतिकता म्हणून पाहता येईलही. मात्र, अनेकदा वैयक्तिक अनुभव आणि वैयक्तिक व्यथा या सार्वजनिक शहाणपण देणाऱ्या असतात आणि खडसे यांच्या या विधानांकडे अधिक व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे.
खडसे हे भाजपमधील केवळ बुजुर्ग नेते आहेत असे नाही, तर महाराष्ट्रात भाजपचा विस्तार होण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरीने भाजपला बहुजन समाजाचा चेहरा देण्यासाठी जे झटले त्यांच्यात खडसे हेही होते हे भाजपलादेखील नाकारता येणार नाही. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर आणि मुंडे यांच्या अकाली निधनानंतर खडसे, नितीन गडकरी हे तसे महाराष्ट्र भाजपमध्ये ज्येष्ठ. मात्र गडकरी यांना राज्यात फारसा रस राहिला नाही. तेव्हा खडसे हे तसे एक प्रकारे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार. तथापि 2014 मध्ये मोदी लाटेत भाजप सत्तेत आला तेव्हा मुख्यमंत्रिपदाची माळ फडणवीस यांच्या गळ्यात पडली आणि खडसे यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले. राजकारणात कोणाच्या हाताखाली कोणाला कधी काम करावे लागेल याची शाश्वती नसते.
प्रणव मुखर्जी यांच्या अर्थमंत्रिपदाच्या काळात ज्या मनमोहन सिंग यांना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर नेमण्यात आले तेच मनमोहन सिंग पुढे पंतप्रधान झाल्यावर मुखर्जी यांना त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपद स्वीकारावे लागले. पक्ष नेतृत्वाच्या डोक्यातील गणिते वेगळी असतात आणि त्यामुळे खडसे यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली आणि नंतर जमीन बळकावण्याप्रकरणी मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर खडसे यांना पक्षाने सातत्याने पदापासून दूर ठेवले. ज्या खडसे यांना राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा होती त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत साधी उमेदवारीदेखील देण्यात आली नाही. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनादेखील पक्षाने तशीच वागणूक दिली आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आपल्या पक्षांतर्गत स्पर्धकांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करीत आहेत असे वातावरण निर्माण झाले.
एकीकडे कॉंग्रेसमध्ये बुजुर्गांची पकड ढिली होत नाही म्हणून तरुण पिढी अस्वस्थ आहे आणि दुसरीकडे भाजपमध्ये बुजुर्गांना उचित स्थान मिळत नाही म्हणून अस्वस्थता आहे. कॉंग्रेसमधील तेवीस नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ नेता हवा, अशी मागणी केली आणि भाजपमध्ये सुब्रमण्यम स्वामी पक्षाच्या आयटी सेलवर आपलीच बदनामी चालविण्याचा आरोप करतात आणि खडसे फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडतात. आपल्यावरील आरोप सिद्ध झालेले नसतानाही आपल्याला फडणवीस यांनी पद्धतशीरपणे बाजूला फेकले आणि एरव्ही ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना मात्र फडणवीस यांनी निःसंकोचपणे क्लीन चिट दिली हेही खडसे यांच्या उद्रेकामागील एक कारण आहे. अन्य अनेक आरोप खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केले आणि मुख्य म्हणजे नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे आरोप केले.
सामान्यतः याचा अन्वयार्थ कोणालाही कळू शकतो. ज्यांच्या उपस्थितीत त्यांनी हे आरोप केले तेही फडणवीस यांचे समर्थक मानले जात नाहीत. तेव्हा खडसे यांच्या आरोपांतील शब्द त्यांचे असले तरी ती भावना अधिक व्यापक असू शकते असा अर्थ निघाला तर आश्चर्य वाटू नये. मुळात भाजपची एकेकाळची संस्कृती ही जी संघटनाधिष्ठित आणि कार्यकर्ताआधारित होती तशी ती आता राहिली आहे का केवळ निवडणूक लढविण्याचे यंत्र असे पक्षाचे स्वरूप झाले आहे, असाही प्रश्न यातून निर्माण होतो. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांतून जी बेसुमार आयात केली ती केवळ निवडणूक जिंकणे एवढ्याच निकषाने केलेली होती.
ज्या अजित पवार यांच्यावर भाजपने सातत्याने सिंचन गैरव्यवहारप्रकरणी गंभीर आरोप केले त्या अजित पवार यांच्यासह पहाटे फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. खडसे यांनी “मी पुन्हा येईन’ या फडणवीस यांच्या वल्गनेचा देखील समाचार घेतला आहे आणि अशा वल्गना जनतेला आवडत नाहीत असा अंगुलीनिर्देश देखील केला आहे. तेव्हा संताप आणि नाराजी यातून खडसे यांनी ताजी विधाने केली असली तरीही भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हे मात्र उघड झाले आहे. मात्र, खडसे यांच्या अशा वारंवार विधाने करून त्यांच्या पक्षातील पुढच्या मार्गात अधिकच अडथळे येणार यात शंका नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काही काळापूर्वी खडसे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तेव्हा खडसे यांच्यासमोर आता आदळआपट करण्यावाचून अन्य फारसे पर्याय उपलब्ध नाहीत असे दिसते.
तथापि, त्यामुळेच खडसे यांच्या या उद्रेकाकडे पक्ष फारसे लक्षही देत नसावा. खडसे यांनी आपण पक्ष सोडू येथपर्यंत वातावरण निर्मिती केली होती; पण युती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री जसे आपण राजीनामे खिशात घेऊन फिरतो अशा राणा भीमदेवी घोषणा करीत असत. तद्वत खडसे यांच्या धमक्या पोकळ असाव्यात अशी भाजप नेतृत्वाची खात्री झालेली असावी आणि भाजपबाहेर गेलो तर आपले राजकीय भवितव्य काय, अशी चिंता नारायण राणे प्रभृतींचे काय झाले हे पाहून खडसे यांना वाटत असावी. तेव्हा खडसे यांचा उद्वेग कितीही तीव्र असला तरी आपले व्यक्तिगत राजकीय सामर्थ्य हे पक्षाला आव्हान देऊ शकेल एवढे आहे का, याची चाचपणी खडसे यांनीही करायला हवी.
फडणवीस यांना कायम लक्ष्य करून पुन्हा त्याच पक्षात राहायचे यामुळे त्यांच्या टीकेची धारही कमी होईल. वस्तुतः खडसे यांची खंत ही भाजपमधील आणि भाजप-सहानुभूतदारांपैकी अनेकांची असू शकते. मात्र, त्या असंतुष्टांचेही नेतृत्व करून दाखविण्याइतकी धमक खडसे यांनी दाखविली नाही तर त्यांच्या वक्तव्यांना, वल्गनांना आणि पुस्तकांना तात्पुरती प्रसिद्धी मिळेल. पण फडणवीस यांना लक्ष्य करण्यापेक्षा भाजपच्या सध्याच्या विधिनिषेधशून्य संस्कृतीला आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होत असलेल्या कार्यपद्धतीला खडसे यांनी लक्ष्य केले तर कदाचित त्यांच्या उद्वेगाला व्यापकता येईल आणि गांभीर्यदेखील.