-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
“एसएफएफ’मध्ये भरती झालेले तरुण तिबेटीयन होते. आता मात्र अनेक वर्षांनंतर एसएफएफमध्ये भरती होणारे तरुण हे भारतात जन्माला आलेले आणि इथेच मोठे झालेले आहेत. आता पुन्हा एकदा एसएफएफचा वापर चीनच्या विरोधात केल्याने त्यांची कामगिरी देशासमोर आली आहे.
नीमा तेन्झिनच्या अंत्यसंस्कारावेळी तिबेट आणि भारताचे झेंडे दिसले. त्यावेळी “भारतमाता की जय’ आणि तिबेटच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. स्पेशल फ्रंटियर फोर्स (एसएफएफ) झिंदाबाद, सॅल्यूट इंडियन आर्मी, विकास रेजिमेंट की जय, अशा घोषणा दिल्या गेल्या. नीमा तेन्झिन हे भारताच्या सुपर सिक्रेट विकास रेजिमेंटचे कमांडो होते.
भारतीय लष्कराच्या खाली ही स्पेशल फ्रंटियर फोर्स रेजिमेंट काम करते आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री, लडाखच्या पॅंगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर चिनी सैनिकांची घुसखोरी रोखताना नीमा तेन्झिन हे भूसुरुंगांच्या स्फोटात जखमी झाले होते. 29 आणि 30 ऑगस्टचा चीनचा भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न जो भारतीय सैन्याने हाणून पाडला. त्यामध्ये एसएफएफचा वापर करण्यात आला.
1962 नंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याने अत्यंत आक्रमकपणे चीनच्या हद्दीमध्ये जाऊन तिथल्या काही शिखरांवर आपले वर्चस्व स्थापन केले. 1962 चे युद्ध हरल्यानंतर एक नवीन कमांडो स्पेशलाईज्ड फोर्स (एसएफएफ) तयार करण्याचा निर्णय घेतला गेला. या कमांडो फोर्सकडे जबाबदारी होती की, चीनने भारतावर हल्ला केला तर चीनच्या अंतर्गत भागात जाऊन त्यांच्या वेगवेगळ्या भागात, परिसरात जाऊन कमांडो पद्धतीने हल्ले चढवून त्यांचे आक्रमण थांबवण्यास मदत करणे.
एसएफएफची उभारणी
1959 सालामध्ये 3 लाखांहून अधिक तिबेटी नागरिक दलाई लामांबरोबर भारतामध्ये आले. भारताने 1962 मध्ये तिबेटमधील लढाऊ जमातीमधून 10 हजार तरुणांची निवड करून एसएफएफ कमांडो फोर्स उभारण्यात आली. डेहराडूनपासून 100 किलोमीटर दूर चक्राता गावी त्यांचे ट्रेनिंग सेंटर तयार करण्यात आले. त्यांना अतिशय कठीण कमांडो ट्रेनिंग हे भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यांची संख्या आता दहा हजारांहून अधिक असावी. ऑपरेशनली भारतीय सैन्य त्यांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करत असते.
त्यांचे प्रशिक्षण आणि इतर सर्वच बाबी ह्या भारतीय सैन्याखाली केल्या जातात. एसएफएफचे मुख्य काम आहे की, चीनमध्ये जाऊन गुप्तहेरी करणे, महत्त्वाच्या बातम्या काढणे, गरज पडल्यास तिबेटमधील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करणे. त्यांना जंगलामधली लढाई, डोंगराळ भागातील लढाई, हेलिकॉप्टर्सच्या मदतीने शत्रूवर हल्ला करणे अशा प्रकारची विविध अत्यंत कठीण कमांडो प्रशिक्षण देण्यात येते. यापूर्वीचे भारतीय सैन्याचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल दलबीर सुहाग हे सैन्यप्रमुख होण्याआधी एसएफएफचे प्रमुख होते. त्यांना हेलिकॉप्टर ट्रेनिंग आणि एअरबॉन्ड ट्रेनिंग आग्य्रामध्ये देण्यात आले.
काही कालावधीनंतर सहारणपूर येथे सरसावाला त्यांना पुढील प्रशिक्षण देण्यात आले. 1960 पर्यंत अशा 6 बटालियन उभारण्यात आल्या होत्या. त्यांचे नेतृत्व कर्नल हुद्द्याचे अधिकारी करायचे. अनेक तिबेटी नागरिक अधिकारी म्हणून यामध्ये भरती झाले होते. अर्थात, सर्वात जास्त अधिकारी सैन्यातील स्पेशल फोर्सेस आणि पायदळातील असतात. त्यांच्या मदतीला एव्हिएशन रिसर्च सेंटर म्हणजे हवाई दलाच्या पायलटने चालवलेली स्पेशल विमानेही अनेक वेळा देण्यात आली.
बांगलादेशमधील ऑपरेशन ईगल
1971 च्या लढाईमध्ये तीन एसएफएफच्या तुकड्यांचा वापर चित्तगांवमध्ये करण्यात आला होता. या कारवाईला “ऑपरेशन ईगल’ म्हटले जाते, त्यामध्ये एका ब्रिगेडियर हुद्द्याच्या तिबेटीयन अधिकाऱ्याने या फोर्सचे नेतृत्व केले होते. लढाई सुरू होण्याआधी एसएफएफना बांगलादेशमधील काही पूल, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यास सांगण्यात आले होते. हे काम अत्यंत कौशल्याने त्यांनी केले. त्यामध्ये त्यांचे 56 हून अधिक सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि 190 जखमी झाले होते.
चित्तगांव हिलवर त्यांचे नियंत्रण असल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा बांगलादेशमधून म्यानमारमध्ये पळून जायचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला होता. पंजाबमधील “ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा वापर केला होता. नंतरच्या काळामध्ये काश्मीरमध्ये काही वेळा त्यांचा वापर करण्यात आला. चीनची सीमा शांत राहिल्यामुळे हळूहळू त्यांचा वापर चीनच्या सीमेवर कमी होत गेला.
चीनला एक महत्त्वाचा संदेश
तिबेटच्या उच्च स्थानांवर म्हणजे 15-16 हजार फुटांच्या उंचीवरती चिनी सैनिकांना तिथे राहणे कठीण जात आहे. मध्यंतरी अशीही बातमी होती की चीन-नेपाळमधील गोरखावंशियांना चिनी सैन्यात भरती करण्याच्या प्रयत्नात आहे. स्पेशलाइज फोर्सेसचा नियमित वापर न केल्यास त्यांची क्षमता वाया जाते. म्हणून सध्याच्या 29-30 ऑगस्टच्या हल्ल्यामध्ये त्यांचा केलेला वापर हे निश्चितच महत्त्वाचे पाऊल आहे. त्यातून चीनला एक महत्त्वाचा संदेश यामधून देण्यात आला आहे. चिनी सैन्याशी लढण्यासाठी एसएफएफचा उपयोग महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे आपली चीनची विरोधात लढण्याची क्षमता वाढणार आहे.