नवी दिल्ली : सूरत न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांना दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगला सोडावा लागला. यानंतर अनेक काँग्रेस नेते आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आपले स्वत: घर देण्याचा विचार केला. तसं अनेकांनी जाहीरदेखील केले. अनेक समर्थक आणि चाहते राहुल गांधींना पत्र लिहून त्यांच्या घरात राहण्याची ऑफर देत आहेत. जनतेच्या याच प्रेमाला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे.
आपले घर लोकांच्या हृदयात आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही घराची गरज नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावर बोलताना राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. माझं घर रिकामं करुन भाजपने चांगलं काम केलंय, असं म्हणत टोला लगावला. लोक त्यांना पत्र लिहून त्यांच्या घरी राहण्याची ऑफर देत आहेत. भाजप आणि आरएसएसच्या तिरस्कार पसरवण्याच्या विचारसरणीचा काँग्रेस निर्भयपणे सामना करेल आणि विजयही मिळवेल, असंही पुढे राहुल गांधी म्हणाले.
भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी, “भाजपने माझ्यावर अनेक खटले दाखल केले आहेत, त्यांनी मला संसदेतून हाकलले आहे आणि माझे राहते घरही काढून घेतले. पण अशी हजारो पत्रे माझ्याकडे येत आहेत ज्यात लोक लिहितात की राहुल जी, कृपया आमच्या घरी या!, त्यामुळे मी आता असंच म्हणेन की माझे घर घेऊन भाजपने चांगले काम केले आहे. माझं घर चाहत्यांच्या हृदयात आहे, मला कोणत्याही घराची गरज नाही.”असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्यावर झालेल्या ओबीसी OBC समाजाबाबतच्या अपमानाच्या आरोपावरही भाष्य केले. “मी कोणत्याही समाजाविरुद्ध चुकीचे बोललो नाही. मी भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी म्हटल्याप्रमाणे तिरस्काराच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडलं आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राहुल गांधी यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान सोडलं असून ते सध्या त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहत आहेत.हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.