पिंपरी – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार निश्चित केला असून, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील एका नावावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. राज्यस्तरीय पातळीवरून उमदेवाराची दोन दिवसांत घोषणा होणार असून, शनिवारी रात्री राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने शिष्टाई करून उमेदवार निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, उद्यापासून (दि. 31) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसनेही या मतदारसंघात तयारी चालविली आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार घोषित केला नसला तरी दोन दिवसांत सर्वांकडून उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात येत होते.
दरम्यान, लक्ष्मण जगताप यांच्या जागेवर भाजप कोणाला संधी देणार याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता होती. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाच्या एका गटाकडून प्रयत्न करण्यात येत होते. त्यासाठी सोशल मीडियावरून समर्थक मागणीही करत होते. तर दुसऱ्या गटाकडून शंकर जगताप यांचे नाव पुढे करण्यात येत होते.
भाजपने जगताप कुटुंबातीलच उमेदवार असेल, वारंवार जाहीर करताना नाव स्पष्ट न केल्यामुळे उत्सुकता वाढली होती. दरम्यान, राज्यातील एका बड्या नेत्याने शनिवारी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन एका नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपकडून या नावाची घोषणा दोन दिवसांत करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सर्वमान्य उमेदवार
जगताप कुटुंबामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची यावरून वाद असल्याचे पसरविण्यात येत होते. मात्र, सर्वानुमते उमेदवार निश्चित केल्याचे सांगण्यात आले आहे. उमेदवारीवरून कोणताही वाद नसल्याचे शंकर जगताप यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. जगताप कुटुंबातील दोन नावे पक्षाच्या समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यातून कौटुंबिक बैठकीमध्ये एकमत झालेले नाव जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करून भाजपने पहिल्या टप्प्यात तरी बाजी मारल्याचे पहावयास मिळत आहे.
महापालिका निवडणुकीचा विचार
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे 19 प्रभाग येत असून, 57 नगरसेवक या मतदारसंघातून निवडले जाणार आहेत. महापालिकेवर सत्ता आणावयाची झाल्यास या मतदारसंघातून किमान 30 पेक्षा अधिक नगरसेवक भाजपच्या तिकीटावर विजयी होणे गरजेचे आहे. एवढे नगरसेवक निवडून आणण्यासाठी शंकर जगताप यांनाच उमेदवारी देणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह भाजपच्या एका गटाकडून व्यक्त होत आहे.