पुणे – मागील काही दिवसांपासून त्यांच्या चमत्काराच्या मुद्द्यावरुन चांगलेच चर्चेत असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी थेट संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. “संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची’, असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले असून या विधानामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अश्यातच आता देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे आणि नितीन महाराज मोरे यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले…”ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली त्यांच्या बाबतीत ऐकीव माहितीवर चुकीचे वक्तव्ये करू नयेत. अगोदर सविस्तर माहिती घ्यावी आणि मगच बोलावे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मंबाजी रामेश्वर भटाला माफ केले होते. वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे. आम्हीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना माफ करतो. क्षमा करणे हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. तसेच वारकऱ्यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करू नयेत’, असे माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नेमकं काय म्हणाले…
“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुम्ही तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? असं त्यांना विचारण्यात आलं होत. या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, ‘देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी मिळाली. माझ्या पत्नीने माझ्यावर प्रेम केले असते तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते’. असे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणाले.