सांगली : राज्यातील सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच झाडाचे पान का पडले म्हणूनही भाजपा आंदोलन करु शकते, असा टोलाही जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन भाजपाला लगावला आहे. वाळवा तालुक्यातल्या कुरळप इथे पी.आर.पाटील यांच्या अमृत महोत्सव सत्कार कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. आता मुंडे यांच्या विरोधातील तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
जयंत पाटील म्हणाले की, “महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे, पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. त्यात पोलिसांनी काही निष्कर्ष काढला असेल आणि त्या महिलेमे तक्रार मागे घेतल्याचे आपण ऐकले.
धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रारीनंतर भारतीय जनता पार्टीकडून राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपने आंदोलन करण्यासाठी, सरकारला बदनाम करण्यासाठी आणि सरकारविरोधी वातावरणात निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच “झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही,” असा टोलाही मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला.