मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरे यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी आज दिली आहे.
संदीप देशपांडे यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसेच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शिंदे गटासोबत युती करणार का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले, “ही पक्षाची अंतर्गत विषयासंबंधी बैठक होती. तिथे काय चर्चा झाली हे माध्यमांसमोर सांगू शकत नाही. शिंदे गटासोबत युती करण्यासंबंधीच्या बातम्या आम्हीही पाहत आहोत. पण राज ठाकरेंच्या आदेशानुसार मुंबई, नवी मुंबई, संभाजीनगर किंवा इतर महापालिकांच्या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व जागा लढवण्याची तयारी करत आहेत”.
शिंदे गट किंवा भाजपासोबत युती करण्यासंबंधी विचारले असता संदीप देशपांडेनी सध्या राज ठाकरेंनी सर्व जागा लढवण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचा पुनरुच्चार केला. “आमच्या पक्षाचे निर्णय राज ठाकरे घेतात, भाजपा घेत नाही. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार सर्व जागा लढवण्याची तयारी सर्व पदाधिकारी, शाखा अध्यक्ष करत आहेत,” असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले “याआधीही २०० ते २२७ दरम्यान जागा लढवल्या होत्या. २००६, २०१२, २०१७ मध्ये आम्ही सर्व ताकदीने सर्व जागा लढवल्या होत्या. त्याचप्रमाणे यावेळीही २२७ जागा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहोत. तशी तयारी सुरु असून राज ठाकरेंकडून वेळोवेळी आदेश येत आहेत”.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव असून, त्यांनी मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाट्यातील जागा द्याव्यात, असा भाजपाचा विचार आहे. न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.