मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर विरोधकांनी अधिवेशनात यावर सरकारने तोडगा काढावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान, यासर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी याविषयी माहिती दिली. पाऊस पडून जे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली. सलग पाच दिवस पाऊस पडून नुकसान झालं तर मदतीची तरतूद करणारा प्रस्ताव कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मांडण्यात आल. त्यावर चर्चा झाली त्यामध्ये आणखी बदल केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याबद्दलच्या अंतिम निर्णय अवघ्या काही दिवसांमध्ये जाहीर करणार आहेत.
तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. पाच दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. ज्या पीकांचे नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळायची नाही त्या पिकांनाही आता त्या पिकांचही समावेश करण्यात आला आहे.