मुंबई – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर देखील आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पुरात अनेकजण वाहून गेली. तसेच अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे गावकऱ्यांचं घरादाराचं नुकसान झालं आहे. अनेकांचं कुटुंब देखील उद्धवस्त झालं आहे.
दरम्यान, या सगळ्या घटनांची गंभीर दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांनी आज विधान परिषदे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.
19 ते 23 जुलै या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात पीक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आता पाच हजार ऐवजी 10 हजार रुपये मदत देण्यात येईल अशी घोषणा अजित पवार यांनी सभागृहात केली.
तसेच, दुकानांचं नुकसान झाल्यास 50 हजारांची मदत केली जाणार आणि पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत दिली जाईल. असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.