पुणे – अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) भरत गायकवाड यांनी सोमवारी पहाटे आपली पत्नी व वकील असलेल्या पुतण्याला गोळ्या घालून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत तीघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. गायकवाड यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे राज्याच्या पोलिस दलात खळबळ माजली आहे.
सहायक पोलीस आयुक्त भरत गायकवाड (57), मौनी भरत गायकवाड( 54) आणि पुतण्या ऍड.दीपक गायकवाड (34) अशी मृतांची नावे आहेत. मौनी या फॅशन डिझायनर म्हणून कार्यरत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बाणेर भागात गायकवाड कुटुंब राजगृह नावाच्या बंगल्यात वास्तव्यास होते. हे एक सुखवस्तू कुटुंब होते. पोलिस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे भरत गायकवाड 15 जुलै रोजी अमरावतीहून पुण्याला आले होते. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. तर छोटा मुलगा बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. छोटा मुलगा शिक्षणा निमीत्त मुंबईला आहे. घटनेच्या वेळी त्यांच्या घरात मोठा मुलगा आई , सासू , पत्नी आणि पुतण्या होता. गायकवाड अमरावती येथून आल्याने त्यांना भेटायला पुतण्या आला होता. पहाटेच्या सुमारास त्यांची पत्नीसोबत जोरदार भांडणे झाली.
यावेळी त्यांचा पुतण्या, मुलगा आणि आई त्यांच्या खोलीत आले होते. त्यांनी सर्वांना बाहेर पाठवून दिले. दरम्यान त्यांनी पत्नीवर रिव्हाल्वरमधून गोळीबार केल्यावर पुतण्या ऍड. दीपक गायकवाड त्यांच्या खोलीकडे धावला. मात्र त्यांनी पुतण्यावरही गोळीबार केला. दोघेही मृत झाल्याचे दिसताच गायकवाड यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या मुलाच्या लक्षात येताच त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली.
यानंतर घटनास्थळी चतुश्रृंगी पोलिस दाखल झाले. त्यांनी तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. तिथे डॉक्टरांनी तिघांचाही मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा केली. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच सुसाईट नोटसी सापडली नाही. पण घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिस तपासाची वेगवान चक्रे फिरवत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे , पोलीस निरीक्षक सातकर आदींनी धाव घेतली होती.
भरत गायकवाड यांनी पुणे शहरात पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. ते काही काळ चतुश्रृंगी पोलीस ठाण्यातही कार्यरत होते. मागील पंधरा वर्षापासून त्यांचे कुटूंब पुण्यात रहात आहे. त्यांचे कुटूंब पुर्वी नवले पुलाजवळ रहात होते. त्यांनी बाणेर येथे राजगृह नावाचा बंगला बांधला. येथे ते 2022 पासून रहाण्यास आले होते. त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरुन सहायक पोलीस आयुक्त पदावर नुकतीच बढली मिळाली होती. पुढील वर्षी ते निवृत्त होणार होते. त्यांनी स्वत:च्या खासगी रिव्हाल्वरचा वापर केला.
बाणेर येथील राजगृह बंगल्यात ही घटना घडली, त्याच्या आजूबाजूला कोणालाच घटनेबद्दल काही माहिती नव्हती. पहाटे पहाटे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन्ही मृतदेह ससून रुग्णालयात पाठवले. यावेळी परिसरातील नागरिक साखर झोपेत होते. सकाळी पोलीस दिसल्यावर फक्त नागरिकांमध्ये कुजबुज दिसत होती. गायकवाड कुटूंब वर्षभरापुर्वीच येथे रहावयास आल्याने त्यांचा कोणाशीही परिचय नव्हता.