लाहोर : पाकिस्तानावर आर्थिक मंदीचे सावट घोंघावत आहे. त्यातच देश धान्य टंचाईसह महागाईचा सामना करत आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला कोणीही मदत करण्यास तयार नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत हलाख्याची झाली आहे. याच मुद्यावरून आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर निशाणा साधला आहे. आम्ही (पाकिस्तान ) भारताबरोबर तीन युद्ध लढली आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा मिळाला आहे, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं आहे.
पंतप्रधान शरीफ यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले,“भारत आणि पाकिस्तान शेजारी देश असून, एकमेकांबरोबर राहायला हवं. दोन्ही देशांनी शांततेत राहायचं, प्रगती करायची की भांडून संसाधने आणि वेळ वाया घालवायचा ठरवायला हवं. भारताबरोबर तीन युद्ध झाल्याने गरिबी आणि बेरोजगारीला आम्ही सामोरे जात आहे. तसेच, यातून धडा शिकलो आहोत. आता आम्हाला शांततेत जगायचं असून, समस्या सोडवायच्या आहेत,” असे शरीफ यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “पाकिस्तानला गरिबी संपवायची आहे. देशात आनंदाचे वातावरण तयार करायचं आहे. आमच्या लोकांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार द्यायच्या आहेत. आमची संसाधने बॉम्ब आणि दारुगोळ्यावर खर्च करायची नाही. तसेच, काश्मीरमध्ये जे काही चालले आहे, ते थांबलं पाहिजे, हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश आहे,” असे म्हटले.
तसेच “पाकिस्तानजवळ इंजिनीअर्स, डॉक्टर्स आणि कामगार आहेत. याचा वापर आम्ही पाकिस्तानच्या समृद्धीसाठी करु इच्छित आहे. त्यामुळे दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होत, प्रगती करेल. तसेच, भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी संयुक्त अरब अमिराती महत्वाची भूमिका बजावू शकतं,” असेही पंतप्रधान शरीफ म्हणाले.