पुणे, दि. 16 -केवळ शिवरायांचा इतिहास सांगणे हा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा हेतू नव्हता, तर शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीतून समाजात राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. बाबासाहेबांचे हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी 15 नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन यापुढे “शिवसंस्कार दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असा निर्धार इतिहास प्रेमी मंडळींनी बाबासाहेबांच्या निवासस्थानी त्यांना अभिवादन करताना व्यक्त केला.
“इतिहास प्रेमी मंडळ’ आणि “गडवेडे ट्रेकर्स’ यांच्या वतीने पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पर्वती पायथा येथील निवासस्थानी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, गडवेडे ट्रेकर्स चे प्रतीक उभे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रभक्तीने भारलेला समाजच सामर्थ्यसंपन्न देश उभा करू शकेल. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन शिवचरित्र प्रचारार्थ समर्पित केले होते, त्यासाठी त्यांनी प्रचंड अभ्यास आणि भ्रमंती केली होती. मराठ्यांचा इतिहास सांगतानाच पाश्चात्य देश प्रगतीची भरारी मारत असताना आपण भारतीय कोठे कमी पडलो, याचेही चिंतन केले पाहिजे, असे शेटे म्हणाले. उभे यांनी प्रास्ताविक केले. सामूहिक शिववंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.