शिरूर तालुक्यात चर्चांना उधाण
सविंदणे : न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ऊस उत्पादक सभासदांनी बहुमताने निवडून दिल्याबद्दल सभासदांचे आभार मानतो. विरोधी गटाचे व भाजपाचे मोठे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असून याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ही घेतली आहे, असा गौप्यस्फोट शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, या वक्तव्यावर चर्चांना उधाण आले आहे.
पवार म्हणाले की, कारखाना निवडणुकीत विरोधकांनी माझ्यावर व माझ्या कुटुंबावर शिवराळ भाषेत व खालच्या भाषेत टीका केली होती. परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सभासदांनी आमच्या उमेदवारांना दोन हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिले आहे. आमच्यावर विश्वास टाकला असल्याचे त्यांनी सांगून निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांचे मोठे योगदान आहे.
जे लोक म्हणतात आमचे डिपॉझिट गुल केले असते. त्यांनी स्वतःची आत्मपरीक्षण करावे. त्यांना शेतकरी सभासदांनी उत्तर दिले आहे. दादांना भेटणे पक्षात प्रवेश करणे याबाबतच्या तुमच्या हालचाली सुरू आहे. तुम्ही आमच्या पक्षात या तुमच आम्ही स्वागत करू. परंतु पक्षात आल्यावर नीट राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
ते म्हणाले की, उद्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आहे . त्याचवेळी तुम्हाला नक्की कोण अध्यक्ष व कोण उपाध्यक्ष झाले, हे कळणार आहे. घोडगंगा कारखाना मोठा करीत असताना कमी किमतीत होत होता. परंतु विरोधकांना कारखाना मोठा व्हायला नको. त्यासाठी त्यांनी मोठा विरोध केला. त्यामुळे कारखाना मोठा करायला उशीर झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्टेजवर अश्रू गाळल्याने सहानुभूती- पवार
पवार म्हणाले की, मागील भाजपा सरकारने वीज खरेदी करायला हवे. मात्र, उशीर केला. त्यामुळे कारखान्याला मोठा तोटा झाला आहे. वारस नोंद करण्यासाठी लवकरच पावले उचलणार असून कुटुंबातील लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना भेटून एका नावावर एक मत करायला सांगणार आहे. त्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची मन परिवर्तन करणार आहे.
निवडणुकीत एक उमेदवार निवडून आला. लोकशाही आहे. यामध्ये असे होत असते. परंतु स्टेजवर रडणे, घरी जाऊन रडणे व दोन ते तीनवेळा त्यांचा पराभव झाल्याने सर्वांची सहानभूती त्यांना भेटली. इथेनॉल, साखर यांचे दर वाढत आहेत. त्याचा फायदा शेतकरी सभासदांना होणार आहे. कारखाना सुरू होण्यासाठी ऊसतोड कामगार व वाहतूकदार हे महत्त्वाचे आहेत. सध्या कारखाना सुरू झाला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार लवकर दिले जातील, यासाठी राज्य सहकारी बॅंकेने मोठी मदत केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.