आंबेगाव बुद्रुक, दि. 16 (संतोष कचरे ) – महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, जिल्हा परिषदा व सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही वेळेत होतील, असा अंदाज बांधत पुणे महापालिका निवडणुकीसाठी समाविष्ट गावांतील अनेकांनी जोरदार तयारी केली होती. परंतु, त्यानंतर वर्ष उलटले तरी पालिका निवडणूक न्यायालयीन तसेच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेतच अडकल्याने “इच्छुक’ उमेदवारांनीही आता पालिका निवडणूक “होईल तेंव्हा होईल’ अशी भूमिका घेतली आहे.
महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांसाठी दोनच नगरसेवक होते. त्यामध्ये 2019 मध्ये आणखी 23 गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आल्याने नगरसेवकांची संख्याही वाढेल असे वाटत असताना 11 गावांसाठीचा एकच प्रभाग आणि नवीन समाविष्ट 23 गावांसाठीही एकच प्रभाग, अशी रचना असल्याच्या
चर्चेनंतर “इच्छुक’ उमेदवरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पालिकेची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात आली. त्यानुसार आज.., उद्या… करीत संपूर्ण वर्ष उलटले तरी साधी प्रभाग रचनाही अंतिम झालेली नाही. यामुळे निवडणुका कधी होणार? जुनी प्रभाग रचना की नवे प्रभाग? अशा प्रश्नांचा गेल्या वर्षभरात भुगा पडला आहे. आजी-माजी, प्रबळ दावेदार आणि 23 गवांतील “इच्छुक’ उमेदवारांनाही निवडणुकीचे फारसे गांभीर्य सध्या तरी नसल्याचे चित्र आहे.
23 गावे जुन्या प्रभागात विभागली गेल्याने…
लोहगाव, केशवनगर, साडेसतरानळी, उत्तमनगर, शिवणे, आंबेगाव खु., उंड्री, धायरी, आंबेगाव बु. गावठाण, फुरसुंगी, उरुळी देवाची या 11 गावांचा समोवश (दि.4/10/2017) झाल्यानंतरही या गावांचा एकच प्रभाग करीत अवघे दोन नगरसेवक देण्यात आले होते. 11 गावांचा वेगळा प्रभाग करूनही केवळ दोन लोकप्रतिनिधी नेमले गेले. यापार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट 23 गावांचे किती प्रभाग होणार, यावर निवडणुकीची सर्व गणिते अवलंबून असताना ही गावे आहे त्याच प्रभागात विभागली गेल्याने “प्रथम नगरसेवक’ होणाचे स्वप्न बाळगणारे अनेक जण आता पेंगाळले आहेत.