नगर -नगर जिल्ह्यातील सुमारे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून, त्यांना पुढची सूचना मिळेपर्यंत वसतीगृह न सोडण्याचे सांगण्यात आले आहे.काही विद्यार्थ्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मात्र, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी नगरच्या जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अगर प्रशासनाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉक्टर इंडोकोन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉ. महेंद्र झावरे पाटील यांच्यामार्फत 40 विद्यार्थी युक्रेनला गेले आहेत. हे विद्यार्थी वेगवेगळ्या वर्षासाठी शिक्षण घेत आहेत. सध्या हे विद्यार्थी तेथील वसतीगृहात राहात आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांनी आपल्या कुटुंबाशी तसेच संबंधित ऍकॅडमीच्या शिक्षकांशी संपर्क केला. युक्रेनमधील भारतीय दुतावासाने त्या मुलांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.तसेच काही समस्या आली तर तात्काळ कळवावी, असेही सांगितले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याचे कळल्यानंतर संबंधित मुलांच्या पालकांनी थेट इंडोकोन ऍकॅडमीच्या शिक्षकांना संपर्क करून विद्यार्थ्यांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणण्याची मागणी त्यांच्याकडे केली. झावरे यांनी सांगितले की, त्यांच्या एजन्सीमार्फत 40 विद्यार्थी युक्रेनला शिक्षणासाठी गेले आहेत. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील 18 जणांचा समावेश आहे.
इतर जिल्ह्यांतीलही विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ती मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे आम्ही यासंदर्भामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केलेला आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. याशिवाय युक्रेनमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी आमचे सातत्याने बोलणे होत आहे,’ असेही झावरे यांनी सांगितले. नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडे अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही सुद्धा याची माहिती घेत आहोत.’ नगर जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुखरूप असले तरी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ज्या ऍकॅडमी विद्यार्थी युक्रेनला गेले आहेत, त्या ऍकॅडमीचा व विद्यार्थ्यांचा संपर्क सुरू असल्याने पालकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.