बंगळुरू :- भारताच्या पुरुष व महिला क्रिकेट संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सराव शिबिर बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) होणार आहे. शिबीर संपल्यावर दोन्ही संघ चीनला रवाना होणार आहेत. सरस गुण व टक्केवारीमुळे भारताचे दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीतील सामने खेळणार आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे शिबिर कमी दिवसांचे असेल तर, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखीलील संघाला स्पर्धेच्या तयारीसाठी 2 आठवडे मिळतील.
व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली 13 सप्टेंबरपासून पुरुष संघाचे शिबिर सुरू होणार असून ते 24 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. तर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाचे शिबीर हांगझूला जाण्यापूर्वी 13 ते 16 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
भारतीय संघ 17 सप्टेंबरला चीनला रवाना होत असताना हृषिकेश कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाचे केवळ 4 दिवसांचे शिबिर होणार असून पुरुषांची स्पर्धा 26 सप्टेंबरला सुरू होणार आहे. महिलांचे सामने 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, तर पुरुषांचे सामने 26 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत.
सर्व सामने टी-20 प्रकारात खेळवले जातील. या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीतच सहभागी होतील. बांगलादेशात झालेल्या मालिकेत पंचांशी वाद घातल्यामुळे तसेच गैरवर्तन केल्यामुळे भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर 2 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तीला उपांत्यपूर्व तसेच उपांत्य लढतीत खेळता येणार नसून या सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व स्मृती मानधना करेल. भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवल्यास हरमनप्रीत कौर संघात पुनरागमन करेल.