बंगळुरु – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2024 मधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र तो कधी परतणार हे स्पष्ट झालेले नाही. मॅक्सवेलने स्वतःला मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्यासाठी हे केले आहे. ( Glenn Maxwell break from IPL)
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मॅक्सवेलची कामगिरी चांगली राहिलेली नाही. या मोसमात खेळलेल्या 6 डावांमध्ये त्याने केवळ 32 धावा केल्या, ज्यामध्ये तो तीनदा शून्यावर बाद झाला. मात्र, आयपीएलमध्ये येण्यापूर्वी तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून आयपीएल सुरू होईपर्यंत खेळल्या गेलेल्या 17 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 42.46 च्या सरासरीने आणि 185.85 च्या स्ट्राइक रेटने 552 धावा केल्या. या काळात त्याने दोन शतकेही झळकावली.
आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब कामगिरीमुळे त्याने सोमवारी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून स्वतःला बाहेर ठेवले होते. मॅक्सवेलने यावेळी सांगितले की, सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून मी माघार घेण्याचा निर्णय घेतला कारण, मला वाटले की, संघासाठी मी सकारात्मक योगदान देऊ शकत नाही. मॅक्सवेल म्हणाला, ‘सुरुवातीच्या सामन्यांमध्ये माझी कामगिरी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे होते. मी शेवटच्या सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि प्रशिक्षकांशी बोलून आणखी काही खेळाडूंना संधी द्यावी, असे सुचवले. मी याआधीही अशा परिस्थितीत होतो, जिथे तुम्ही खेळत राहता आणि स्वतःला आणखी अडचणीत आणता. माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विश्रांती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही त्याने म्हटले.
दुसऱ्याला संधी देणे चांगले
संघाची कामगिरी पाहता हा निर्णय सोपा असल्याचे मॅक्सवेल पुढे म्हणाला. आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही. माझी स्वतःची कामगिरीही संघाच्या कामगिरीचे प्रतिबिंब दाखवते. गेल्या काही मोसमात आम्ही पॉवरप्ले आणि मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करत होतो, पण यावेळी खूप उणिवा आहेत. मला असे वाटले की मी सकारात्मक योगदान देऊ शकत नाही. त्याच्याकडे पाहता अन्य खेळाडूला संधी देणे योग्य ठरेल. या ठिकाणी नवीन खेळाडू चांगली कामगिरी करू शकेल, अशी अपेक्षा आहे.
परतण्यास आशावादी
मॅक्सवेलला आशा आहे की, लवकरच तो पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार होईल. तो यावेळी म्हणाला की, स्पर्धेपूर्वीचे सहा महिने माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम महिने होते. त्यामुळे गोष्टी अशा प्रकारे घडल्या हे निराशाजनक आहे. पण जर मी माझे शरीर आणि मन बरोबर ठेवले तर मला पुन्हा संधी मिळाल्यास स्पर्धा पूर्ण करण्याची माझ्याकडे प्रत्येक संधी आहे.
आरसीबी गुणतालिकेत तळाशी आहे
घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध 7 सामन्यात आरसीबीचा एकमेव विजय होता. या विजयातून 2 गुण घेतल्यानंतरही संघ दहाव्या स्थानावर कायम आहे. आता पात्रतेसाठी संघाला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.