Acid attack – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) ने जारी केलेल्या नवीन अहवालानुसार, बंगळुरूमधील महिला गेल्या वर्षी देशात सर्वाधिक अँसिड हल्ल्यांच्या बळी ठरल्या आहेत. २०२२ मध्ये बंगळुरूमध्ये सर्वाधिक ६ अँसिड हल्ले झाले.
त्यापैकी पोलिसांनी सहा गुन्हे दाखल केले. या यादीत दुसरे नाव दिल्लीचे आहे. जिथे पाच महिला अँसिड हल्याच्या बळी ठरल्या. आकडेवारीनुसार, एनसीआरबीने जवळपास १९ मोठ्या शहरांची यादी जाहीर केली आहे.
बंगळुरू आणि दिल्लीनंतर अहमदाबाद तिसऱ्या स्थानावर आहे, जिथे अशा पाच प्रकरणांची नोंद झाली आहे. अहवालानुसार गेल्या वर्षी दिल्लीत सर्वाधिक ७ अँसिड हल्ल्याचे प्रयत्न झाले. यानंतर गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये असे ३ गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये २०२२ मध्ये प्रत्येकी दोन अशा हल्ल्यांच्या प्रयत्नांची नोंद झाली.
२८ एप्रिल २०२२ रोजी २४ वर्षीय एमकॉम विद्यार्थिनी कामावर जात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. या व्यक्तीला नंतर मे महिन्यात तिरुवन्नमलाई आश्रमातून पकडण्यात आले, जिथे तो स्वामी म्हणून लपला होता. यासह १० जून २०२२ रोजीही एका व्यक्तीने प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने तिच्या चेहऱ्यावर अँसिड फेकल्याचा आरोप आहे.
दिल्ली सर्वांत असुरक्षित शहर
एनसीआरबीच्या अहवालानुसार दिल्ली हे महिलांसाठी सर्वांत असुरक्षित शहर आहे. येथे २०२२ मध्ये येथे एका दिवसात ३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. एनसीआरबीच्या ५४६ पानांच्या अहवालानुसार, देशात एकूण ४ लाख ४५ हजार २५६ महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे, याचा अर्थ दर तासाला सुमारे ५१ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. २०२१ मध्ये हा आकडा ४ लाख २८ हजार २७८ होता.
चौकट महिलांविरोधात सर्वाधिक गुन्हे !
१. उत्तर प्रदेशः ६५,७४३
२. महाराष्ट्रः ४५,३३१
३. राजस्थानः ४५,०५८
४. पश्चिम बंगालः ३४,७३८
५. मध्य प्रदेशः ३२,७६५