बंगळुरू – आयटीचे मोठे हब मानल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाणी वाया घालवणाऱ्यास दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणी वाया घालवताना कोणी आढळले तर त्याला पाच हजार रूपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीच चूक दुसऱ्यांदा करताना आढळले तर आणखी पाचशे रूपये अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.
१. ३ कोटी लोकसंख्या असलेल्या बंगळुरू शहराला आपल्या रोजच्या वापरासाठी १५०० एमएलडी पेक्षा अधिक पाण्याची टंचाई भासते आहे. केवळ बंगळुरूच नाही तर तुमकुरू आणि उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्येही पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
राज्यातील २३६ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. यातील २१९ तालुक्यांमध्ये गंभीर टंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून पाण्याचे रिसायकलिंग करण्याच्या प्रस्तावावरही विचार केला जातो आहे.
कर्नाटक सरकारकडून नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. टँकरची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर युध्दपातळीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. टँकर्सची मागणीही प्रचंड वाढली असून बंगळुरूच्या जिल्हाधिकाऱ्यांना टँकरचे दर निश्चित करावे लागले आहेत.
दरम्यान, गाड्या धुणे, बांधकाम अथवा चित्रपटगृहात गेल्यावर पाण्याची नासाडी करणे अशा बाबींवर निर्बंध घालण्यात आले असून त्यावर नजर ठेवली जाते आहे.