नगर – भाजपच्या संघटनात्मक पद रचना बदलल्यानंतर नगर शहरासह दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. या पदांसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असतांना त्या सर्वांना बाजूला सारून नव्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी यावेळी देण्यात आली आहे. नगर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक भैय्या गंधे, दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी अरूण मुंढे तर उत्तर नगरच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाचे निवडणूक अधिकारी व विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी जाहीर केले. या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवर संघ परिवार व माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांचा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. या नव्याने नियुक्त्यामुळे अनेक इच्छुक नाराज झाले असून यात बदल करण्याच्या दृष्टीने जो तो आपल्यापरीने आता प्रयत्नाला लागला आहे.
गेल्या शुक्रवारी दि. 10 जानेवारी रोजी नगर शहरासह दक्षिण व उत्तर असे स्वतंत्र तीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आ. बागडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नगर शहरासाठी 8, दक्षिणेसाठी 17 तर उत्तरेसाठी 14 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. दक्षिणेमध्ये 17 पैकी एकाने माघार घेतली असली तरी 16 जण या पदासाठी आग्रही होते. आ. बागडे यांनी सर्व इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेवून त्यांच्या एकमत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात अपयश आले. कोअर कमिटीच्या सदस्यांनी देखील इच्छुकांमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न केला.
कोअर कमिटीसमोर आ. बागडे यांनी प्रत्येकी तीन नावे आणली. त्यातून एक नाव निश्चित करण्याचे या कमिटीला सांगण्यात आले. यातून एक नाव निश्चित करणे अवघड असल्याने कोअर कमिटीने सर्व नावे प्रदेशकडे पाठविण्याची सुचना केली. या नियुक्त्या प्रदेशपातळीवरून करण्याचे मत कोअर कमिटीने दिल्याने आ. बागडे यांचाही नाईलाच झाला. अखेर जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय प्रदेशाच्या कोर्टात पाठविण्याचे आ. बागडे यांनी जाहीर केले.
नगर शहराच्या जिल्हाध्यक्ष सचिन पारखी, दक्षिण माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तर उत्तरच्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची नियुक्ती करण्याचे कोअर कमिटीत ठरले होते.
परंतु कर्डिले हे इच्छुक नव्हते. त्यात दक्षिणेत इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे प्रदेशपातळीवर हा निर्णय घेण्यात आला. नगर शहरात विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी व माजी शहरजिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर असे दोन गट आहे. त्यामुळे शहरात संघटना वाढीला मर्यादा पडल्या. या दोन्ही गटातील वादाचे पडसाद महापालिका निवडणुकीसह अन्य निवडणुकीवर उमटले होते. त्यामुळे या दोन्ही गटापासून अलिप्त तसेच संघटना वाढीसाठी प्रभावी ठरणारा म्हणून गंधे यांची नियुक्ती शहरजिल्हाध्यक्षपदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अरूण मुंढे यांची नियुक्ती त्याच पद्धतीने करण्यात आली आहे.
हे पक्षाचे जिल्हा सरचिटणीस होते. ते कोणत्याही गटाचे नसल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांच्यावर प्रा. शिंदे यांचा प्रभाव आहे. त्याबरोबर मुंढे हे माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीला मुंडेंचे पाठबळ मिळाल्याची चर्चा आहे. उत्तर जिल्हाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली. ते माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर विरोधक असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी जिल्ह्यात होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. अशावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांचा कस लागणार आहे. त्यांना कोण कशा पद्धतीने सहकार्य करेल. हे आता पुढे दिसेल.
विखेंचा दबदबा झाला कमी
कॉंग्रेसमध्ये असतांना जिल्हाध्यक्षासह अन्य नियुक्त्यांसाठी पक्षाच्या निरीक्षकांना थोरात व विखे अशा दोन्ही नेत्यांना सांभाळातांना मोठी कसरत करावी लागत होती. या दोन्ही नेत्यांच्या वादात पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळणे देखील कठिण होत होते. पण भाजपमध्ये माजीमंत्री राधाकृष्ण विखे आल्यानंतर त्यांना पक्षाच्या संघटनापातळीवर कोणताही हस्तक्षेप करता आला नसल्याचे दिसते. त्यामुळे विखेंचा पक्षातील दबदबा कमी झाल्याचे चित्र आहे.
भाजप हा विचारधारा असलेला पक्ष असून जनसामान्यांच्या विश्वासामुळेच केंद्रात भाजप सत्तेत आहे. महाराष्ट्रात काही कारणांनी भाजप विरोधी पक्ष असला तरी राज्यातही सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेला पक्षाची पिछेहाट झाली असली तरी येत्या काळात भाजप पुन्हा अग्रस्थानी येईल. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून वैचारिक वारसा घेवून आपण भाजपमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असून जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत व व्यापक करण्याचा प्रयत्न राहिल.
अरुण मुंढे, जिल्हाध्यक्ष, भाजप.