श्रीगोंदा – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीसाठी सध्या सेवा सोसायटीकडून ठराव तयार करण्याचे काम सुरू असतांना श्रीगोंदे तालुक्यात थेट सोसायटीच्या सचिवाचे अपहरण करण्यात आले. तालुक्यातील कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये, म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुध्द पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कोथूळ संस्थेचे सचिव राजेंद्र मधुकर खोल्लम, (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) यांचे शनिवारी नाहाटा, पानसरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण केले. त्यांना एका निर्जनस्थळी खोलीत डांबून ठेवले. रविवारी होणाऱ्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीस हजर राहिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील धमकी दिली. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार बन्सीलाल नाहाटा, कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे, विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर, अमोल लाटे यांच्या विरोधात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने होण्यासाठी ही घटना घडल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. संचालकांनी बैठकीस गैरहजर रहावे, म्हणून सचिव राजेंद्र खोल्लम यांना पिंपळगाव पिसा येथून मोटारसायकल बसविले. तेथून त्यांना घारगाव येथे आणले. यानंतर चार चाकी वाहनातून पुणे कृषी विद्यापीठात जबरदस्तीने बसवून नेले. सोसायटीचा चार्ज का आणला? असे म्हणून उद्याचा ठराव झाला तर तुला गाडीखाली चिरडून मारून टाकू? असा दम दिला. यानंतर त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवले. पानसरे, नाहाटा यांच्यासह अन्य लोकांनी त्यांनी ठराव झाला तर तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळास भेट दिली. पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे करीत आहेत.
सध्या जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या सोसायटी मतदारसंघातील 14 जागांसाठी सेवा सोसायटीचे ठराव घेण्याचे काम सुरु आहे. श्रीगोंद्यात जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक पानसरे व माजी आमदार राहुल जगताप तसेच नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे इच्छुक असून त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात आता पानसरे व जगताप यांच्यात जोरदार लढत सुरू झाली असून थेट सचिवांचे अपहरण करण्यापर्यंत मजल गेली आहे. यापूर्वी ठरावांची पळवापळवी होत होती. पण आता तर ठराव आपल्या बाजूने होण्यासाठी सचिवांसह अन्य संचालकांवर दमटाटी करून दबाव आणला जात असल्याने जिल्हा बॅंकेची निवडणूक आता वेगळ्याच वळणावर जात असल्याचे दिसत आहे.