अकोले – तरुणांना राजकारणात वापरून घेतले गेले आहे. मात्र आता तरुणांनी लग्न जमवण्यासाठी शिक्षण न घेता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण घ्यावे, असे आवाहन युवा आमदार रोहित पवार यांनी केले. तसेच अहमदनगर हा शब्द जितका साधा सरळ व सोपा शब्द आहे, तितके येथील या जिल्ह्यातील राजकारण मात्र सोपे नाही, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
अकोले तालुका पत्रकार संघाने आमदार पवार यांचे ग्रामीण महाराष्ट्र, आव्हाने व उपाय या विषयावर पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्याख्यान आयोजित केले होते. तेव्हा तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य होते. व्यासपीठावर आ. डॉ. किरण लहामटे होते.
यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते राहीबाई पोपेरे, ममता भांगरे, सोनाबाई भांगरे, शांताबाई बांडे, हिराबाई गभाले, हिराबाई भांगरे या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला, तर पत्रकार संघाचे सदस्य प्राचार्य शांताराम गजे यांना पां. वा. गाडगीळ पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित आ. डॉ. लहामटे यांचाही पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ग्रामीण महाराष्ट्रातील विविध समस्यांवर बोट ठेवताना आ. पवार यांनी पाणी, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, शासकीय योजनांबाबत समाजात असणारे अज्ञान यावर विस्ताराने भाष्य केले. तसेच त्यावर उपाययोजना सांगताना सविस्तर विवेचन केले. ‘लाथ मारू तिथे पाणी काढू’ असा आत्मविश्वास युवकांनी स्वतःजवळ बाळगावा. भविष्यात काय व्हायचे, याची दिशा युवकांनी निश्चित करावी आणि नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे बनावे, असे आवाहन केले.
आ. डॉ. लहामटे यांनी अकोले तालुका म्हणजे महाराष्ट्रातील काश्मीर असून, पर्यटन हा मुख्य व्यवसाय आणि शेती ही दुय्यम व्हावी, यासाठी आपण निश्चितपणाने भावी काळात प्रयत्न करू. येथील पत्रकार सचोटीचे आणि घटनेची सत्यता पडताळून लिखाण करणारे आहेत, अशी प्रशंसा त्यांनी केली. प्रास्ताविक अमोल वैद्य यांनी केले. परिचय भाऊसाहेब चासकर यांनी करवून दिला. सूत्रसंचालन प्रकाश आरोटे यांनी केले. प्राचार्य इंद्रभान कोल्हाळ यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.