नगर -जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज त्यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 239 झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
शहरातील रेल्वे स्टेशन येथील 28 वर्षीय महिला, शाहूनगर (केडगाव) येथील 34 वर्षीय महिला व एमआयडीसी परिसरातील गजानन कॉलनी येथील 48 वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे. याशिवाय, राहाता येथील 40 वर्षीय, 56 वर्षीय आणि 32 वर्षीय पुरुष, असे तिघे बाधित झाल्याचे उघड झाले आहे. रेल्वे स्टेशन भागातील महिलेला आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने ती दवाखान्यात दाखल झाली होती. केडगाव येथील महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. एमआयडीसी भागातील बाधित व्यक्ती सारीची लक्षणे जाणवल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला.
त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर राहाता शहरातील तिघेही बाधित हे यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून, संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू केला आहे. तसेच आज जिल्ह्यातील आणखी सहा व्यक्ती करोना मुक्त होऊन घरी परतल्या आहेत. यापैकी पाच व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, तर एका व्यक्तीला कोपरगाव येथून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील ब्राह्मणगल्ली (माळीवाडा) येथील तीन, श्रीरामपूर, संगमनेर येथील प्रत्येकी एक अशा पाच व्यक्तींचा समावेश आहे. येथील डॉक्टर्स, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप देत चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या. जिल्रह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 167 झाली आहे.