मुंबई – त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. मात्र त्याला हिंसक वळण लागलं होतं. यावरून मलिक यांनी भाजपवर टीका केली. तसेच आशिष शेलार यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान काही मौलाना फिरत असतात, मात्र राज्यात दंगल घडवण्याएवढी रझा अकादमीची ताकद नसल्याचं म्हणतांना मलिक यांनी आशिष शेलार यांच्यावर हल्ला चढवला. रझा अकादमीच्या कार्यालयात बसून शेलार काय करत होते, असा सवाल मलिक यांनी केला. तसेच आपल्याकडे एक फोटो असून दंगलीतील सर्व आरोपींची चौकशी करण्यात येईल, असा इशाराही मलिक यांनी दिला.
त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, नवाब मलिक हे प्रत्येकवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करत असतात. हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016-17च्या फोटोचा संबंध काय? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिले.