औरंगाबाद : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या भर बैठकीत हे दोन नेते एकमेकांच्या समोर आले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ समोर आला आहे.
विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. यावर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या आरोपाला खोडून काढले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
खरं तर, आज जिल्हा अधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाच्या आमदाराने केला. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. यानंतर काही वेळाने दोन्ही नेत्यांमधील वाद थांबल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “प्रत्येकाला वाटतं की, आम्ही सत्तेत नसतानाही आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे. त्यांचा विकास झाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो, त्या आमदाराला निश्चित जास्त निधी मिळतो, हा अलिखित नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी दिला जात होता, त्यामध्ये कुठेही कमी केली नाही. तरीही तुम्हाला आणखी वाढीव निधी कशाला पाहिजे? त्यामुळे पालकमंत्री आणि इतर सहकारी संबंधित आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही.”