मुंबई – प्रवीण तरडे यांनी एका पेक्षा एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, ट्रिपल सीट आणि धर्मवीर असे अनेक सुपरहिट चित्रपट मराठी कलाविश्वाला देणारे अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा सर्व भूमिका त्यांनी उत्तमरित्या पेलवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता प्रवीण तरडे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्यास सज्ज झाले आहे.
नुकतेच प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकला शिस्तीचे पालन करावे लागते. मी तर म्हणेन, साउथमधला प्रत्येकजण नियमांचे पालन करतो. आपल्या मराठी इंडस्ट्रीतही प्रत्येकजण नियमांचे पालन करतात. सर्व कलाकार वेळेत येतात. कोणीही उशीरा येत नाही. पण साउथची एक खासियत म्हणजे, कलाकार सकाळी 7 ची शिफ्ट असेल तर साडेसहालाच येऊन आपली पुढची तयारी करतात’.
पुढे ते म्हणाले की, “मला तयारी करण्यासाठी जवळपास अडीच तास लागत होते. त्यामुळे सातच्या शिफ्टसाठी पहाटे साडेतीनला सहाय्यक दिग्दर्शक उठवायला यायचे. माझा मेकअप चार वाजण्याच्या सुमारास सुरु होत असे. अडीच तासाच्या तयारीनंतर बरोबर 7 वाजता मी सेटवर हजर रहायचो. सात वाजता ओके टेकचा आवाज यायचा. एवढी शिस्त मी अजुनपर्यंत कुठेच पाहिली नाही. साउथ इंडस्ट्रीत जशी काम सुरु व्हायची वेळ अचूक असते. तशीच काम संपण्याचीही अचूक वेळ असते. वेळेत शुटिंग सुरु झाल्यानंतर ते वेळेतच संपवले जात असे. काहीवेळा शुटिंग वेळेआधी संपले तर पॅकअप बोलले जाते. ही साउथची शिस्त आहे.”
दरम्यान, एस.एस राजामौली यांच्यासोबत काम करण्याचे प्रवीण तरडे यांचे स्वप्न होते. अखेर ते स्वप्न पूर्ण होणार आहे. एस.एस राजामौली दिग्दर्शित चित्रपटातून प्रवीण तरडे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या चित्रपटाच्या नावाबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.