मुंबई – ठाकरे सरकारमध्ये कॉंग्रेसला योग्य स्थान नाही, अशी नाराजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज व्यक्त केली. तसेच तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी सरकारमध्ये कॉंग्रेसला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद आहेत. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मतभेद असलेल्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. येत्या दोन दिवसांमध्ये ही भेट होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील धुसफूस काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाही, यावरून कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी याआधीही भावना व्यक्त केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.