श्रीगोंदा – कुकडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडून प्राधान्याने श्रीगोंदा तालुक्याला पाणी द्यावे, त्याचबरोबर अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी दिली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या तालुक्यातील सदस्यांनी नेहमीच गप्प बसण्याची भूमिका घेतल्याने कुकडीच्या पाण्याबाबत श्रीगोंद्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. कुकडी प्रकल्पात ९२ % पाणीसाठा होऊनही शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. मागील आवर्तनात उद्भवही भरले नाहीत. एकीकडे धरणातून हक्काचे पाणी मिळत नसताना पुणे जिल्ह्यातील मंडळी पाण्याची राजरोसपणे चोरी करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात कुकडीच्या पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची तयारी शेतकऱ्यांना ठेवावी लागणार आहे, अन्यथा लाभक्षेत्रातील शेतकरी कायमचा उध्वस्त होईल.
शेलार पुढे म्हणाले, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याच्या अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. हे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या दोन्ही मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, संजय आनंदकर, रुपेश काळेवाघ आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी गायब
सध्या लोकप्रतिनिधी अक्षरशः गायब आहेत, त्यांचे कोणत्याही प्रश्नात लक्ष नाही. त्यांच्या अनुपस्थित सोशल मीडियावर दिसणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना देखील सर्वसामान्यांच्या वेदना जाणून घ्यायला वेळ नसल्याची टीका घनश्याम शेलार यांनी केली.