नागपूर – अध्यक्षपद कॉंग्रेसकडे होते. कॉंग्रेसने संग्राम थोपटे यांचे सुचवले होते. आमच्याकडे भरपूर उमेदवार होते. पण, अजित पवारांनी महाविकास आघाडीची चूक झाली हे कबूल केले आहे. काही लोक अकारण माझ्यावर खापर फोडण्याचे काम करीत आहे, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडीकडून अध्यक्षांची निवड करण्यात उशीर झाल्याचे अजित पवारांनी मान्य केले आहे. मग यात कॉंग्रेसचा आणि इतरांच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही. आम्ही अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलेला होता. मी कोणालाही न सांगता, विश्वासात न घेता राजीनामा दिल्याचाही आरोप होतो. पण, मी संबंधितांना सांगूनच राजीनामा दिला होता, असेही पटोले यांनी यावेळी म्हटले.
तसेच भाजपने नेहमीच लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले. आताही त्यांनी तेच केले असेही पटोले म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांना अधिकार असतो. तेच अध्यक्ष म्हणून काम पाहातात. आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहाताना आमदारांना अपात्र ठरवलेच आहे. मग अध्यक्षांचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल पटोले यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच नाना पटोले यांनी विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते आणि आज तेच अध्यक्ष राहिले असते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरणही त्यांच्यासमोर सुनावणीसाठी आले असते. याने वेगळी कलाटणी मिळाली असती असे सांगितले जाते.