मुंबई – एवढी नैतिकता-नैतिकता म्हणत आहात. तुम्हाला नैतिकतेची इतकी चाड आणि खुमखुमी असेल, तर ठाकरे गटाच्या चौदा-पंधरा आमदारांनी राजीनामा द्यावा. निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. ते मुंबईत बोलत होते. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाकरे गट लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. कोर्टाने फक्त दोन प्रकरणांवर टिपण्णी केली. चार प्रकरण फेटाळले. मला वाटते यांना निवडणुकीची खूप घाई झालेली आहे. यांना नैतिकतेची एवढी खुमखुमी असेल, तर भाजप-शिवसेनेच्या मतावर निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या चौदा-पंधरा आमदारांनी अगोदर राजीनामा द्यावा. निवडणुकीला पुढे जावे. तुम्हाला कोण थांबवत आहे, असे आव्हान त्यांनी दिले.
शिंदे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि ठाकरे गटाचे खूप लोक आमच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच. ते आजच सांगितले, तर येणारे सरप्राइज कसले, असे हसत-हसत एका प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.