मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ‘भावी मुख्यमंत्री’ असे उल्लेख असणारे अजित पवारांचे बॅनर्स लावण्यात येत आहे. पण, ‘बॅनर्स लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी काम करावं लागतं,’ असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना लगावला आहे. त्याला आता अजित पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे.
माध्यमाशी बोलताना “मुख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं? कसं काम केल्यावर पक्ष आपल्याला तिकीट देतो,” अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी,“आता मुंबईला चाललो आहे. वेळ मिळाल्यावर नागपूरला जाण्याचा प्रयत्न करेन. तिथे जाऊन बावनकुळे भेटतो. मुख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं? कसं काम केल्यावर पक्ष आपल्याला तिकीट देतो. कसं काम नाही केल्यावर पक्ष तिकीट नाकारतो. आपल्यालाही आणि बायकोलाही तिकीट नाकारतो. याची माहिती बावनकुळेंकडून घेतो. त्यांचा सल्ला घेऊ माझ्या बुद्धीला पटला, तर तशा पद्धतीने पुढं जाण्याचा प्रयत्न करतो,” अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.
“महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल,’ असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. त्याबद्दल विचारल्यावर अजित पवारांनी म्हटलं की, “जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो.”
राज्यात सध्या कोकणातील बारसू प्रकरणावरून “ऑईल रिफायनरी प्रकल्प नाणारला होणार होता. पण, तिथे विरोध झाल्याने बारसूची जागा निवडली आहे. मी देखील बारसूला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी राजन साळवी यांचा बारसूच्या प्रकल्पाला पाठिंबा आहे. विकासाच्याबाबत सत्ता कोणाचीही असो किंवा नसो. सर्वांनी सकारात्मक रित्या पाहिलं पाहिजे. सरकारने संवेदनशील मार्गाने हा प्रश्न सोडवायला हवा,” असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.