Ajit Pawar : राज्यात आगामी लोकसभेचे वारे वाहताना दिसून येत आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शिरूर लोकसभा मतदार संघावरील दाव्यावर ठाम असल्याचे सांगत त्यांनी एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही थोपटले आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं. तसंच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, असे म्हणत त्यांचा याविषयी ठाम निर्णय असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, “ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे, त्यांनी माझ्यासोबतच यावं, ज्यांना दुसऱ्या बाजुला जायचं आहे, त्यांनी तिकडे जावं, माझ्या बाजूनं म्हणजे काय हुकुमशाही आहे का? ज्यांनी माझी बाजू घेतली, त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नका, मेहरबानी करा, खरं जे बोलतो तेच सांगा.”, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच अनेक कार्यकर्ते अजुनही दोन्ही बाजूंनी दिसतात, असं विचारताच अजित पवार म्हणाले की, “असू द्यात ना, मी सांगायचं काम केलं आहे, बघु काय फरक दिसतोय का? माझ्या दृष्टीनं जे योग्य वाटतं, ती भूमिका घेण्याची मला मुभा आहे, मला इतरांनी टोकण्याचं कारण नाही.” असे म्हणत त्यांची भूमिका स्पष्ट असल्याचे म्हटले.
अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी, “एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या.”, असे म्हटले आहे.
त्यासोबतच “उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी आज तुला सांगतो की, निवडून आणून दाखवेल.”, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.