Amol Kolhe : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पाडणार म्हणजे पडणारच असे म्हणत दंड थोपटले आहेत. त्यांच्या या टीकेला आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी “एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं. आता उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही, आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं, हे माझ्या तत्वात बसत नाही. ही वस्तूस्थिती आहे, असे म्हटले आहे. त्यासोबतच, अजित दादा मोठे नेते आहेत, काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणं, हे मला पटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना, “एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं. आता उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही, आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं, हे माझ्या तत्वात बसत नाही. ही वस्तूस्थिती आहे, या दोघांनीही त्यावेळी 100 टक्के प्रयत्न केले. मी हे नाकारण्याचं काहीच कारण नाही.असे म्हणत त्यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे.
तसेच “दादा मोठे नेते आहेत, इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याविषयी काहीच बोलणं उचित ठरणार नाही. ना मी राजकारणातला, ना मला कोणती राजकीय पार्श्वभूमी, ना माझा कारखाना, ना माझी शिक्षण संस्था आहे. काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणं, हे मला पटत नाही. मी मला जबाबदारी दिलेली, हे मला महत्त्वाचं वाटतं आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली, हीसुद्धा अशीच पार पाडीन. यापुढेही शिरुर मतदारसंघातले महत्त्वाचे प्रश्न आहे, ते मार्गी लावण्याचं काम करत राहीन. मला वाटत नाही की, दादांइतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं बोलावं हे मला बरोबर वाटत नाही.”, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी कमी शब्दात आपली प्रतिक्रिया दिली.
तर पाच वर्ष मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याच्या अजित पवारांच्या आरोपांवर , “अनेकदा स्वतः अजित पवारांनीही अनेक ठिकाणी भाषणांमध्ये कौतुक केलं आहे. कदाचित त्यांना माहिती देणाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे. यामध्ये काहीतरी गैरसमज झाले आहेत. जर काम केलं नसतं, तर कोविड काळात पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा आपला देशातला एकमेव मतदारसंघ आहे. इंद्राणी मेडीसीटीसारखा प्रोजेक्ट शिरुर लोकसभा मतदारसंघात मांडला आहे. छत्रपती संभाजीराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धारही करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून 30 हजार कोटींचे प्रकल्प शिरुर मतदारसंघात येत आहेत. कामच केलं नसतं, तर हे सगळं आलंच नसतं.”असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
तर “निवडणूक हे केवळ माध्यम असतं, आपण राजकारणाकडे पाहताना निवडणुकीकडे साध्य म्हणून पाहतो, सत्ता हे केवळ माध्यम आहे. आपण काम करणं जास्त महत्त्वाचं. आपली तत्व, आपली निष्ठा हे सर्व लक्षात ठेवत काम करणं महत्त्वाचं असतं.”, असे म्हटले तसेच अमोल कोल्हेंनी खासगीत राजीनामा देणार असल्याचे सांगितल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावर अमोल कोल्हे म्हणाले की, “मला वाटतं विश्वासानं खासगीत सांगण्याच्या काही गोष्टी असतात, त्या खासगीत ठेवण्याचा संकेत असतो. मला वाटतं हा संकेत माझ्याकडून तरी किमान पाळला जावा. त्यामुळे माझं असं काही बोलणं झालं असेल, तर ते खासगीतच राहावं असं मला वाटतं.” असे कोल्हे यांनी यावेळी म्हटले.