मुंबई – शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फुट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतर पक्षांनी देखील आता या नव्या राजकीय परिस्थिवर भाष्य करायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला होता असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे देखील पवारांच्या समर्थनासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले. यापूर्वी मी जाहीरपणे बोललो होतो तेव्हा अडचणीत देखील आलो होतो. असं घडतंय हे माहिती होत काही महिन्यांपासून काय घ्यायचं याच्या वाटाघाटी चालू होत्या असं पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याची आमची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करून किंवा अध्यक्षांकडून त्यांच्या विरोधात निकाल घेऊन अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकत असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपविरोधात ताकदीनं लढत राहू असंही ते म्हणाले.
राज्यातील राजकीय वातारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अशात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील आता उपमुख्यमंत्री बनले आहे. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.