मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरूनच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्य सरकारवर चांगलेच संतापले आहेत. जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
त्याच बरोबर ‘हा प्रकार राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारी आहे,’ असाही हल्लाबोल केला. “शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरू असतील, तर ते तात्काळ थांबवावेत,” अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले, “नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्यांची जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांची माहिती भरण्याच्या ‘केसपेपर’मध्ये जातीचा रकाना असून त्याठिकाणी जात लिहिणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. रुग्णांना त्यांची जात विचारुन नंतर उपचार करण्याचा प्रकार, जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे.”
“शासकीय किंवा खासगी कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरू असतील, तर ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना द्यावेत,” अशी मागणी अजित पवार यांनी केली.