शिर्डी – पश्चिम नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी मोठा खर्च लागणार असून, ही योजना पूर्णत्वास नेणे राज्याच्या आर्थिक आवाक्याबाहेर आहे. मात्र, या योजनेला केंद्र सरकारने मदत केल्यास लाखो, करोडो शेतकऱ्यांना फायदा होऊन राज्य दुष्काळमुक्त होईल, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या जन्मापूर्वी निळवंडेचे काम सुरू झाले होते. ते आज 50 वर्षांनंतर पूर्ण होत आहे. गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारने राज्याला 30 हजार कोटी रुपयांचा निधी सिंचनाच्या कामासाठी दिला असून, त्यामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. मात्र, आजही मराठवाडा, विदर्भासह दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे दुष्काळी आहेत. त्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविल्यास राज्य दुष्काळमुक्त होईल. त्या प्रकल्पाचा आराखडा तयार आहे. मात्र, खर्च मोठा असल्याने केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. तो धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील पंतप्रधानांना या योजनेसाठी केंद्राने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली.
मोदींच्या हाताला यशाचा परीस स्पर्श
गेल्या वर्षभरात घेतलेले निर्णय तुमच्यासमोर आहेत. समृद्धी, मेट्रो, 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. ते कार्य पुढे नेत आहोत. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे काम सरकार करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाला हात लावतात, भूमिपूजन करतात तो प्रकल्प वायूवेगाने पुढे जातो आणि पूर्ण होतो असा अनुभव आहे. त्यांच्या हाताला यशाचा परीस स्पर्श आहे. हात लावताच त्याचे सोने होते असा अनुभव आहे. म्हणून आम्ही त्यांना वारंवार बोलावतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.