इंदापूर (प्रतिनिधी) – मराठवाड्यात जन्माला आलेल्या आमच्या भगिनी बारामतीत पवारांच्या घरी सून म्हणून येते. या सुनेला तुम्ही परकी म्हणता, तुमच्या घरात देखील मुली आहेत. त्या कोणाची सून म्हणून जाणार आहेत. फक्त निवडणूक जिंकायची म्हणून आपल्या सुनेला परक म्हणत आहेत. इतकी वाईट वेळ राजकारणात कोणावर येऊ नये इतकी वाईट वेळ उत्तुंग नेतृत्वावर, मत मागण्यासाठी आलेली आहे, अशी सडकून टीका थेट शरद पवारांवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेे यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे बारामती लोकसभा मतदार संघाच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची जाहीर सभा शनिवार, दि.२७ रोजी पार पडली.
यावेळी मुंडे बोलत होते. माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले, यांच्यासह भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, दुसऱ्या देशाचा एखादा मंत्री आपल्या देशाबद्दल वाईट बोलला तर तेथील पंतप्रधान त्या मंत्र्याचा राजीनामा घेतात. इतकी मोठी पत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची करून ठेवलेली आहे. देशात ८० कोटी जनतेला मोफत राशन दिले जाते. यामध्ये हिंदू मुस्लिम हे बघितले जाते का ? असाही सवाल विरोधकांना धनंजय मुंडे यांनी केला.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्यासह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी प्रास्ताविक केले. तर, श्रीमंत ढोले यांनी आभार मानले.
देशाची प्रतिष्ठा वेगळ्या उंचीवर…
देशातील १४० कोटी जनतेच्या जीवनमानात बदल होईल अश्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात संपूर्ण देशाची सूत्रे देण्यासाठी लोकसभा निवडणूक आहे. दहा वर्ष मोदी साहेब देश सांभाळतात. दहा वर्षातील देशाची प्रगती पाहिली रस्त्याच्या माध्यमातून, दवाखान्याच्या माध्यमातून,चंद्रयान पोहोचल्याने,या देशाची पत आणि प्रतिष्ठा उच्च उंचीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेलेली आहे.
तरी देखील, देशातली ३३ राजकीय पक्ष मोदी साहेबांना पाडण्यासाठी,एकत्र केले आहेत. परंतु ६६ राजकीय पक्ष जरी एकत्र आले तरी देखील,देशात मोदींचाच विजय होईल, असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.