छत्रपती संभाजीनगर – राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यासंदर्भात सिल्लोड न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अब्दुल सत्तारांविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास त्यांची आमदारकी जाऊ शकते. तसेच हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला त्यांच्या संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अब्दुल सत्तार यांनी 2014मध्ये मीन खरेदी केली होती. 2019मध्ये निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत माहिती देताना त्यांनी याच जमीनीची किंमत अधिकच दाखवली.
याशिवाय इतर 4 ते 5 मालमत्तेच्या किंमतीतही तफावत असल्याचे समोर आल्यामुळे सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी (12 जुलै) दिले आहेत.
सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी 2021मध्ये अब्दुल सत्तार यांनी निवडणूक शपथ पत्रात खोटी माहिती दिल्याची याचिका दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. तपास करताना सत्तार यांच्या एकूण चार ते पाच मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याचे आढळून आले. यामुळे सिल्लोड अब्दुल सत्तारांविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.