अमरावती :- “दिव्यांग मंत्रालय दिल्याने मी सदैव एकनाथ शिंदे यांचा गुलाम म्हणून काम करेल, मंत्रिपदावरील दावा सोडण्याचा निर्णय मी आज घेणार होतो, पण गेला अर्धातासात मुख्यमंत्री शिंदे यांचे मला खूप फोन आले. त्यांनी मला भेटल्याशिवाय कोणता निर्णय घेऊ नका असे सांगितले आहे, त्यांना 17 तारखेला भेटून 18 तारखेला मी निर्णय घेईल, असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
मला मंत्रिपदाचा हव्यास नाही. मी मंत्रिपदासाठी त्यांच्यासोबत गेलो नाही. आमच्या हातून काही चुका झाल्या असतील त्या यापुढे होऊ नये यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत. मला दिव्यांगासाठी आणि मतदारसंघासाठी वेळ द्यायचा आहे, मंत्रिपद घेतले तर तो देता येणार नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कडू पुढे म्हणाले की, अजित पवार आले म्हणून मी काही नाराज नाही. लोक मंत्रिपद मागताय मला मंत्रालय भेटले आहे. एकनाथ शिंदे यांचे माझ्यावर ऋुण आहे. बच्चू कडू स्वत: साठी काहीच मागणार नाही, मला तशी शिकवण नाही, दोन पावले मागे घेऊन पद हा विषय माझ्यासाठी नाही.
उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला…
कडू पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सरकार बनत असताना त्यांनी स्वत: मला फोन करत सरकारला पाठिंबा द्या असे म्हटले होते. त्यावेळी त्यांना गरज होती असे आम्हाला वाटले म्हणून त्यांना साथ दिली. मात्र, बरेचदा विरोधकांकडून इतर पक्षाकडून आम्हाला मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आले. पण आम्ही ठाम होतो, तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द राखत मला राज्यमंत्री केले, मी त्यांचे आभार मानतो.
..तर गुवाहटीला गेलो नसतो
जे नवीन समीकरण जुळत गेले त्यावेळी मी अनेकदा उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयाबद्दल बोललो, तेव्हाच जर ते झाले असते तर मला गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जात असताना त्यांना दिव्यांग मंत्रालयाची अट घातली होती. त्यांनी ते दिले हेच माझ्यासाठी सर्वांत मोठे पद आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.