शिमला – कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्या राज्यातील ९ बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी उत्तराखंडला मुक्काम हलवला आहे. त्यांच्या समवेत हिमाचलमधील भाजपचे २ आमदारही आहेत.
त्यामुळे हिमाचलमध्ये राजकीय भूकंप अटळ असून त्याचा केंद्रबिंदू भाजपशासित उत्तराखंड ठरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीपासून हिमाचलमधील कॉंग्रेस सरकारवर अस्थिरतेचे ढग घोंघावू लागले आहेत.
हिमाचलमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या एकमेव जागेसाठीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. कॉंग्रेसच्या ६ आमदारांनी बंंडखोरी करत भाजपच्या पारड्यात मत टाकल्याने ती उलथापालथ घडली.
त्यानंतर अर्थसंकल्पावरील मतदानापासून दूर राहिल्याच्या कारणावरून त्या आमदारांना अपात्र ठरवण्यात आले. त्याआधीच राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच बंडखोर आमदारांनी हरियाणातील पंचकुला गाठले.
तिथून शुक्रवारी रात्री ते विशेष विमानाने उत्तराखंडला पोहचले. त्यांच्या समवेत भाजपचे २ आणि ३ अपक्ष आमदारही होते. त्यांनी आता ऋषिकेशमधील हॉटेल ताजमध्ये मुक्काम ठोकला आहे. हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अशात उत्तराखंडच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय मंत्री बी.एल.वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना लवकरच हिमाचल सरकार कोसळण्याचे भाकित केले. राज्यसभा निवडणुकीतून राजकीय संकटाची चाहूल लागल्यानंतर तातडीने पुढे सरसावत कॉंग्रेस श्रेष्ठींनी हालचाली केल्या.
त्याशिवाय, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुखू यांच्या सरकारला तात्पुरते का होईना जीवदान मिळाल्याचे चित्र होते. मात्र, बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी उत्तराखंड गाठल्याने हिमाचलात आणखी राजकीय उलथापालथी घडण्याची चिन्हे बळावली आहेत.
त्यातून कॉंग्रेसच्या पातळीवर बैठका, चर्चांचे सत्र सुरू झाल्याचे समजते. हिमाचल विधानसभेचे एकूण संख्याबळ ६८ आहे. कॉंग्रेसच्या ६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने त्या पक्षाचे आणि विधानसभेचे संख्याबळ घटून अनुक्रमे ३४ आणि ६२ इतके झाले आहे. भाजपचे २५, तर ३ अपक्ष आमदार आहेत.