मुंबई : राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यासह देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. अनिल बोंडे यांचादेखील विजय झाला. या विजयानंतर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे लगे. धक्का लागल्यानंतरही विचारलं तर शरद पवार म्हणतील लागलं नाही. ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे वीस तारीख आहे. त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे. त्यांना धक्क्यावर धक्के सहन करावेच लागणार आहे. तेव्हादेखील त्यांनी म्हणावं की काही लागलं नाही,” असे अनिल बोंडे म्हणाले.
विजयानंतर अनिल बोंडे यांनी बोलताना, “देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा सांगितलंय की हे सरकार कधी पडेल याचा मुहूर्त सांगू नये. हे सरकार आपापसातील कलहाने पडेल. जनतेला हे सरकार डोईजड झाले आहे. आमदार विटलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सद्सदविवेक बुद्धीने मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. किती दिवस अपक्ष आमदार किंवा लहान पक्ष अन्याय सहन करणार,” असे अनिल बोंडे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. मुख्यमंत्र्यांशी आज कोणता आमदार भेटू शकतो? मंत्रीतरी भेटू शकतो का? असा सवालदेखील त्यांनी केला.
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांच्या या प्रतिक्रियेवरही अनिल बोंडे यांनी उत्तर दिले आहे. “संजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी. खरं पाहिलं तर संजय राऊत आणि शिवसेना यांचा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय झाला होता, तो त्यांचा विजय नव्हताच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील हे सांगून त्यांनी आपले उमेदवार निवडणूक आणले होते. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. यावेळी कोणासोबतही युती न करता आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे राऊत यांनी विजयाची व्याख्या समजून घ्यावी,” अशी टीका अनिल बोंडे यांनी केली.